May 24, 2026
211b3cc8-c2b6-4a9b-af0f-b040c1ea2439

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दीड महिन्यात चार खुनांच्या घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिक, उद्योजक आणि कामगार वर्गामधून चिंता व्यक्त केली जात आहे.

या काळात घडलेल्या घटनांमध्ये २२ एप्रिल रोजी बजाजनगर येथील साधना सोनपेटकर यांच्या खुनाची घटना समोर आली. त्यानंतर ३० एप्रिल रोजी वडगाव कोल्हाटी परिसरातील करण गायकवाड यांचा निर्घृण खून करण्यात आला. १८ मे रोजी विटावा शिवारात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. तर चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कृष्णा राठोड यांचा २० मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या सलग खून प्रकरणांमुळे वाळूज एमआयडीसी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रात्रीच्या वेळी सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग राहत असल्याने वाढत्या गुन्हेगारीमुळे अस्वस्थता वाढली आहे.

दरम्यान, पोलीस प्रशासनाने गस्त वाढवून गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी, तसेच संशयितांवर वेळीच नियंत्रण ठेवावे अशी मागणी उद्योजक, व्यापारी आणि सामान्य नागरिकांकडून होत आहे. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे वाळूज एमआयडीसी परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

॰॰॰॰॰


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!