May 13, 2026
e23d1a0c-2d1b-4b5f-a4dc-110a616237be

छत्रपती संभाजीनगर : सिडको व वाळूज महानगर परिसरातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर पंचायत समिती सदस्य दत्तात्रय वर्पे यांनी आज दि. ११ मेपासून एमआयडीसी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. परिसरातील सुमारे ६५ हजार नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात येत आहे.

औद्योगिकीकरणामुळे परिसरातील पाणवठे दूषित झाल्याने नागरिकांकडे पाण्याचा दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. उद्योगांना पाणी पुरवठा केला जात असताना स्थानिक नागरिक आणि कामगारांना नियमित पिण्याचे पाणी मिळत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

सिडको प्रशासन आणि पंचायत समिती सदस्य दत्तात्रय वर्पे यांनी अनेकदा एमआयडीसी प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने अखेर अमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. नागरिकांना निदान गरजेपुरते दररोज १२ एमएलडी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

यासंदर्भात एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता रमेश गिरी यांच्यासोबत चर्चा झाली होती. मात्र ती निष्फळ ठरल्याचे सांगण्यात आले. तसेच या प्रश्नावर पालकमंत्री Sanjay Shirsat यांच्याशीही चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान, आज सुरू झालेल्या उपोषणाला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून अनेक नागरिकांनी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी सतीश हिवाळे, दीपक कानडे, दत्तू कोठाळे, केशवराव देशपांडे, मुबीन शेख, ज्ञानेश्वर फुलारे, मंदार खोचे, किरण शिंदे, जनार्दन चिल्लारे, विजय कुबेर, ओम देशमुख, सिद्धार्थ नरसाळे आणि देवेंद्र तरटे उपस्थित होते

॰॰॰॰॰


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!