June 16, 2026
4d5d2bae-b529-4cea-80ff-f44551de897f

छत्रपती संभाजीनगर | न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : ESICधारक कामगार उमेश शेषराव दुधाट यांनी वाळूज महानगरातील वाळूज हॉस्पिटलवर गंभीर आरोप करत कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. उपचारासाठी दाखल झाल्यानंतर अवैधरित्या पैसे उकळणे, उपचारात निष्काळजीपणा, डॉक्टर उपलब्ध नसणे तसेच रुग्णाची अवहेलना करण्यात आल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.

तक्रारीनुसार, उमेश दुधाट यांना ११ जून २०२६ रोजी मूळव्याधीचा तीव्र त्रास सुरू झाल्याने त्यांनी ESIC टाय-अप असलेल्या वाळूज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी धाव घेतली. मात्र सुरुवातीला हॉस्पिटल प्रशासनाने भरती करण्यास नकार दिला. मोबाईलमध्ये उपलब्ध असलेले ESIC कार्ड दाखवूनही त्यांच्याकडून १०० रुपये रोख घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सुरुवातीला त्या रकमेची पावती देण्यास नकार देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

भरती केल्यानंतरही डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगून दोन दिवस प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर गंभीर अवस्थेत असताना औषधे आणण्यासाठी स्वतः खाली जाण्यास भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच हॉस्पिटलमधील स्वच्छतेचा अभाव, दुर्गंधीयुक्त शौचालये आणि सलाईन चुकीच्या पद्धतीने लावल्यामुळे हात सुजणे व रक्तस्त्राव झाल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणि योग्य उपचार न मिळाल्याने अखेरीस त्यांनी बजाजनगर येथे उपचार घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, नंतर पुन्हा हॉस्पिटलमध्ये जाऊन मागणी केल्यानंतर १०० रुपयांची पावती देण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून संबंधित हॉस्पिटल व जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, ESIC टाय-अप रद्द करावे तसेच झालेल्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासाबद्दल नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी उमेश दुधाट यांनी ESIC प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत वाळूज हॉस्पिटलचे डॉ. अमोल करडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रुग्णाचे आरोप फेटाळून लावले. “ESIC चे अप्रूव्हल येईपर्यंत आम्ही रुग्णांवर उपचार सुरू ठेवतो. अनेकदा रुग्णांकडे ESIC कार्ड किंवा आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसतात. अशा परिस्थितीत हॉस्पिटलचा खर्च होतो. काही रुग्ण उपचार घेऊन वाद घालून निघून जातात. त्यामुळे १०० रुपयांची फी घेऊन उपचार सुरू केले जातात. संबंधित प्रकरणात ESIC चे अप्रूव्हल आले नव्हते. उपचार सुरू असतानाच रुग्ण कोणतीही माहिती न देता हॉस्पिटलमधून निघून गेला आणि नंतर तक्रार दाखल केली,” असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना डॉ. करडे म्हणाले, “ही बाब व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिली असती तर आम्ही रुग्णाचे समाधान करून उपचार पूर्ण केले असते. हा प्रकार काही गैरसमजातून घडला असावा. रुग्णांची सेवा करणे हे आमचे कर्तव्य असून आम्ही नेहमीच रुग्णांना सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करतो.”

दरम्यान, या प्रकरणातील आरोप व प्रत्यारोपांमुळे ESIC संलग्न रुग्णालयांमधील सेवा आणि रुग्णांच्या सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

॰॰॰॰


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!