June 19, 2026
ae85c67f-812b-49a0-8b48-26127033135c

वाळूज महानगर | न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शे.पु. येथील पवननगर परिसरात भाड्याच्या घराच्या वादातून २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून घरमालकासह तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महारुद्र बळीराम राऊत (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचा भाऊ वीरभद्र बळीराम राऊत याने दिलेल्या फिर्यादीनुसार, मे २०२६ मध्ये महारुद्र याने त्याचा मित्र प्रदीप मापारी व त्याची पत्नी पल्लवी मापारी यांना पवननगर येथील बाबासाहेब बटुळे यांची खोली भाड्याने मिळवून दिली होती. मात्र, प्रदीप व पल्लवी यांनी घरमालकाला कोणतीही माहिती न देता तसेच थकीत भाडे न भरता खोली रिकामी करून निघून गेल्याचा आरोप आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, १२ जून रोजी दुपारी बाबासाहेब बटुळे यांनी सलून दुकानात जाऊन महारुद्र राऊत व त्याच्या कुटुंबीयांसमोर थकीत भाड्याची मागणी केली. यावेळी महारुद्रने संबंधितांना फोन करून पैसे मागवून देण्याचे सांगितले असता, बटुळे यांनी त्याचा मोबाईल हिसकावून घेत शिवीगाळ केली तसेच हातपाय तोडण्याची व मारहाण करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेनंतर महारुद्र राऊत घरी गेला. दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास त्याचा भाऊ प्रभात राऊत जेवणासाठी घरी गेला असता घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले. खिडकीतून पाहणी केली असता महारुद्र याने घरातील सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. कुटुंबीयांनी त्याला तत्काळ उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

दरम्यान, मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून बाबासाहेब बटुळे, प्रदीप मापारी व पल्लवी मापारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास वाळूज एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

॰॰॰॰


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!