February 13, 2026
31ca1d90-765e-40dc-8db3-2f70d8a675ef

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) :

वाळूज (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान बजाजनगर परिसरातील वाढत्या कचरा समस्येचा मुद्दा सर्वच विरोधी पक्षांकडून आक्रमकपणे उपस्थित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना टीकेला सामोरे जावे लागले. काही उमेदवारांनी ‘जिथे कचरा तिथे प्रचार’ करत प्रशासनावर निशाणा साधला होता.

मात्र, निवडणुकीत विजयी झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य सचिन गरड यांनी दिलेला शब्द पाळत कचरा प्रश्नाच्या कायमस्वरूपी समाधानासाठी तातडीची पावले उचलली आहेत. गरड यांनी एमआयडीसी प्रशासन व महिंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेत बजाजनगरमधील रस्त्यांवरील कचरा त्वरित हटवण्याबाबत चर्चा केली.

सध्या बजाजनगरमधील कचरा संकलनाचा ठेका एमआयडीसीकडून महिंद्रा कंपनीला देण्यात आला आहे. मात्र कंपनी केवळ ट्रॅक्टरद्वारे आणून दिलेला कचरा उचलते, रस्त्यांवरील विखुरलेला कचरा साफ केला जात नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढली होती.

बैठकीनंतर सचिन गरड यांनी सांगितले की, “बजाजनगरमधील रस्त्यांवरील कचरा लवकरच साफ करण्यात येईल. ही समस्या कायमची सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत.” निवडून आल्यानंतर पहिले काम आणि नंतर राजकारण, ही भूमिका त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिल्याने नागरिकांकडून त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

या बैठकीस एमआयडीसी अधिकारी, महिंद्रा कंपनीचे प्रतिनिधी, तसेच ग्रामपंचायत सदस्य विजय सरकटे तसेच आशिष पावडे, ज्ञानेश्वर भगत, भागवत जाधव, अभिषेक माने, श्रीकांत नवपुते आणि अक्षय राठोड उपस्थित होते.

बजाजनगरमधील कचरा प्रश्न निकाली निघणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

॰॰॰॰


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!