August 2, 2025
2a1e46b2-ca68-4178-b400-13d088f86595.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – 

छत्रपती संभाजीनगर :  वाळूज औद्योगिक क्षेत्र तसेच बजाजनगर नागरी वसाहतीत गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर एमआयडीसी प्रशासनाने अलीकडेच मोजणी करून अतिक्रमण असलेल्या जागांवर स्पष्ट मार्किंग केले आहे. परिणामी अतिक्रमण काढण्याची मोहीम अखेर २ ऑगस्ट शनिवारपासून सुरू होणार आहे.

यासंदर्भात परिसरात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळणार असून अतिक्रमण धारकांनी स्वखुशीने आपली अतिक्रमणे दोन दिवसांत हटवावीत, अन्यथा शनिवारपासून प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा एमआयडीसी प्रशासनाने दिला आहे.

या संदर्भात ३० जुलै बुधवार रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप यांच्या कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता रमेशचंद्र गिरी, प्रादेशिक अधिकारी अमित भांबरे, उपकार्यकारी अभियंता गणेश मुळीकर आदी अधिकारी उपस्थित होते. बैठकीत वाळूज औद्योगिक क्षेत्र व बजाजनगर परिसरातील अतिक्रमण काढण्याच्या सविस्तर कार्यपद्धतीवर चर्चा करण्यात आली.

तसेच, अतिक्रमणधारक नागरिकांशी संवाद साधण्यासाठी शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, वाळूज एमआयडीसी परिसरात सुमारे १२०० ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर जेसीबी, पोकलेन व ट्रॅक्टरच्या सहाय्याने ही अतिक्रमणे निष्काशित केली जाणार आहेत.

नागरिकांनी  प्रशासनाच्या आवाहनाची गंभीर दखल घ्यावी आणि अतिक्रमण स्वखुशीने काढून सहकार्य करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

॰॰॰॰


error: Content is protected !!