March 22, 2026
img_0352-1.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) –

वाळूज : लिंबे जळगाव येथे बुधवारी (२ जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. काठ्या, चाकू आणि लोखंडी गजाच्या सहाय्याने दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला चढवला. यामध्ये दोन जण जखमी झाले असून, एक चारचाकी व एक दुचाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी दोन्ही गटांतील सहा जणांना अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष दिगंबर गवळी (वय ४८, रा. लिंबे जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत श्रीकांत पडघन, अंजली नाटकर, करण नाटकर, अर्चना मनाळ व किरण जाधव यांनी गैर कायदेशीर जमाव करून लाकडी दांडे व लोखंडी गजाच्या सहाय्याने त्यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांच्या चारचाकी वाहनाची (एमएच २० एफयू ०१३१) काच फोडून नुकसान केल्याचे नमूद आहे.

दुसरीकडे, श्रीकांत संजय पडघन (वय २१, रा. लिंबे जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीत संतोष गवळी, दिनेश करडे, ज्ञानेश्वर गवळी, गणेश मोटे आणि एक अनोळखी व्यक्ती यांनी संगणमत करून मारहाण केली. यावेळी चाकूचा वापर करून त्याला जखमी केल्याचे सांगितले आहे. तसेच विनयभंगाचा आणि दुचाकीची तोडफोड केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वाळूज पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात संतोष गवळी, दिनेश करडे, गणेश मोटे तसेच श्रीकांत पडघन, करण नाटकर आणि किरण जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. रमेश राठोड करत आहेत.

  • भरधाव अज्ञात वाहनाचा धक्का; पादचारी ठार, चालक फरार

    न्युज मराठवाडा वृत्तसेवा :

    छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील कामगार चौक येथे भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका पादचारीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
    याबाबत पोलीस ठाणे एमआयडीसी वाळूज येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
    फिर्यादी मीराबाई लक्ष्मण जाधव (वय 45, रा. भंडारवाडी, ता. रेणापुर, जि. लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, दिनांक 15 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास त्यांचे पती लक्ष्मण गोपीनाथ जाधव हे कामगार चौक ते पेंटर चौक दरम्यान पायी जात असताना अज्ञात वाहनाने निष्काळजीपणे व भरधाव वेगात येऊन त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडले.
    धडक दिल्यानंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.


  • घरघुती सिलेंडरचा व्यवसायासाठी वापर; वाळूजमध्ये नागरिकांचा संताप वाढला

    छत्रपती संभाजीनगर : वाळूज महानगरात घरघुती गॅस सिलेंडरच्या टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, काही व्यावसायिकांकडून त्याच घरगुती सिलेंडरचा सर्रास व्यवसायासाठी वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

    नागरिकांना घरगुती सिलेंडर मिळवण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. अनेकांना बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे, व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असलेले कमर्शियल सिलेंडर उपलब्ध नसल्याने काही व्यावसायिकांनी घरगुती सिलेंडरचा वापर सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.

    कोलगेट चौकाजवळील बीएसएनएल कार्यालयासमोर एका रिक्षामध्ये सुरू असलेल्या पंचर दुकानात घरगुती सिलेंडरचा वापर केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हा व्यवसाय भर रस्त्यात सुरू असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

    काही दिवसांपूर्वी वाळूज एमआयडीसी परिसरात एका बंद कंपनीत शेकडो सिलेंडरचा साठा आढळून आला होता. पुरवठा विभागाने छापा टाकून कारवाईही केली होती. तरीदेखील अशा प्रकारांना आळा बसत नसल्याने प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

    घरगुती वापरासाठी असलेले सिलेंडर व्यवसायासाठी वापरणे हे नियमबाह्य असल्याने संबंधितांवर कठोर कारवाई होणार का, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

    ॰॰॰

  • अवकाळीचा दुहेरी तडाखा; सिल्लोड तालुक्यात बळीराजा संकटात — तात्काळ पंचनामे व मदतीची मागणी

    न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :

    सिल्लोड : सिल्लोड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपिटीमुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
    या गंभीर परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष विजय म्हस्के पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. “शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तत्काळ व वस्तुनिष्ठ पंचनामे करून त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी,” अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
    दरम्यान, आमठाणा (ता. सिल्लोड) परिसरात गुरुवारी (ता.19) सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाची 36 मिलिमीटर इतकी नोंद झाली असून कांदा, सोंगणीला आलेला गहू, मका यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
    सतत सुरू असलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, हरभरा, मका, मिरची आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.


    शेतकऱ्यांची प्रतिक्रिया :
    “अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आमच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मका यांसारखी पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अन्यथा शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी बिकट होईल,” अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
    याबाबत आमठाणा येथील माजी सरपंच अरुण शांताराम मोरे यांनीही प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.



  • वादळी पावसाची चाहूल; गहू-हरभरा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

    न्युज मराठवाडा वृत्तसेवा :

    सिल्लोड : सिल्लोड तालुक्यातील उपळी परिसरात बुधवारी (ता. १८) सायंकाळी अचानक हवामानात मोठा बदल झाला. काळेभोर ढग, विजांचा कडकडाट आणि टपोऱ्या पावसाच्या थेंबांनी वातावरण ढवळून निघाले. वादळी पावसाची शक्यता निर्माण होताच शेतकऱ्यांची शेताकडे धावपळ सुरू झाली.


    रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा ही पिके सध्या काढणीच्या अवस्थेत असल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत दिसून आले. काही ठिकाणी हार्वेस्टरच्या सहाय्याने गहू काढणी वेगाने सुरू करण्यात आली, तर दुसरीकडे आधीच काढून ठेवलेला गहू पावसापासून वाचवण्यासाठी शेतकरी ताडपत्रीने झाकण्याचा आटापिटा करत होते.
    अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पावसामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.



  • भाजपाचा ‘धक्का’; शिवसेनेचा बहिष्कार जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत युतीत तणाव; सभापती निवडणुकीत ‘धडा शिकवणार’ इशारा

    न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :

    छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत अपेक्षित असलेले भाजप-शिवसेना सत्तावाटप अखेर कोलमडले. दोन्ही पक्षांकडे स्पष्ट बहुमत असतानाही ऐनवेळी भाजपाने स्वतंत्र उमेदवार उभे करून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांवर दावा केल्याने शिवसेना (शिंदे गट) संतप्त झाली. या घडामोडींमुळे युतीत तणाव निर्माण झाला असून शिवसेनेने निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकला.
    सुरुवातीपासूनच अध्यक्षपदासाठी दोन्ही पक्ष आग्रही होते. दुपारपर्यंत युतीचाच अध्यक्ष-उपाध्यक्ष होईल, असे दोन्ही बाजूंनी सांगितले जात होते. मात्र, भाजपाने इतर पक्षांच्या सदस्यांचे समर्थन मिळवत अचानक दोन्ही पदांसाठी स्वतःचे उमेदवार अर्ज दाखल केले. त्यामुळे शिवसेनेत नाराजी पसरली.
    या पार्श्वभूमीवर आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या ग्रँड सरोवर हॉटेलमध्ये शिवसेना सदस्यांची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीस माजी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार विलास भुमरे, निरीक्षक विलास पारकर, जिल्हाप्रमुख रमेश पवार, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, शिवसेना जिल्हा परिषद गटनेते राधाकृष्ण पठाडे, अनुराग शिंदे आदी उपस्थित होते. बैठकीत पदाधिकाऱ्यांनी भाजपावर ‘विश्वासघात’ केल्याचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला.
    दरम्यान, पक्षफुट टाळण्यासाठी शिवसेनेने आपल्या २१ जिल्हा परिषद सदस्यांसह काही अपक्ष सदस्यांना एकत्र ठेवत खबरदारी घेतली होती. निवडणुकीच्या आदल्या दिवशी सर्व सदस्यांचा मुक्काम ग्रँड सरोवर हॉटेलमध्ये ठेवण्यात आला होता.
    युती टिकवण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री अतुल सावे तसेच शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले. मात्र अध्यक्षपदाच्या पहिल्या टर्मवरून तिढा सुटला नाही.
    भाजपाच्या या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने निवडणुकीवर बहिष्कार टाकत आगामी सभापती निवडणुकीत भाजपाला ‘धडा शिकवणार’ असा इशारा दिला. तसेच या संपूर्ण प्रकरणाची माहिती पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना देऊन पुढील भूमिका ठरविण्यात येणार असल्याचेही नेत्यांनी स्पष्ट केले.




error: Content is protected !!