
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) –
वाळूज : लिंबे जळगाव येथे बुधवारी (२ जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. काठ्या, चाकू आणि लोखंडी गजाच्या सहाय्याने दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला चढवला. यामध्ये दोन जण जखमी झाले असून, एक चारचाकी व एक दुचाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी दोन्ही गटांतील सहा जणांना अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष दिगंबर गवळी (वय ४८, रा. लिंबे जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत श्रीकांत पडघन, अंजली नाटकर, करण नाटकर, अर्चना मनाळ व किरण जाधव यांनी गैर कायदेशीर जमाव करून लाकडी दांडे व लोखंडी गजाच्या सहाय्याने त्यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांच्या चारचाकी वाहनाची (एमएच २० एफयू ०१३१) काच फोडून नुकसान केल्याचे नमूद आहे.
दुसरीकडे, श्रीकांत संजय पडघन (वय २१, रा. लिंबे जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीत संतोष गवळी, दिनेश करडे, ज्ञानेश्वर गवळी, गणेश मोटे आणि एक अनोळखी व्यक्ती यांनी संगणमत करून मारहाण केली. यावेळी चाकूचा वापर करून त्याला जखमी केल्याचे सांगितले आहे. तसेच विनयभंगाचा आणि दुचाकीची तोडफोड केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वाळूज पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात संतोष गवळी, दिनेश करडे, गणेश मोटे तसेच श्रीकांत पडघन, करण नाटकर आणि किरण जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. रमेश राठोड करत आहेत.
- लाडक्या पत्नीचाच रौद्रावतार! फोन कॉलच्या वादातून नवऱ्यावर चाकू हल्ला


छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी ( संदीप लोखंडे ) –
वाळूज महानगर : पती-पत्नीतील वाद अनेकदा मारहाणीपर्यंत पोहोचल्याच्या घटना समोर येतात. मात्र छत्रपती संभाजीनगरातील वाळूज महानगर परिसरात घडलेल्या एका घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. पत्नी फोनवर कोणाशी बोलत होती, याचा जाब विचारल्याने संतापलेल्या पत्नीने थेट किचनमधील चाकू उचलून पतीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाळूज महानगर-१ येथील एका फ्लॅटमध्ये राहणारे ३८ वर्षीय पती वाळूज एमआयडीसीतील खासगी कंपनीत नोकरी करतात. १८ जून रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास पती-पत्नी घरी असताना पत्नी तिच्या ओळखीच्या व्यक्तीशी मोबाईलवर बोलत होती. हे लक्षात आल्यानंतर पतीने तिला “तू कोणाशी बोलत आहेस?” असा प्रश्न विचारला.
यावरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद सुरू झाला. आरोपानुसार, वाद वाढताच पत्नीने शिवीगाळ करत थेट किचनमध्ये धाव घेतली आणि तेथील चाकू आणून पतीवर वार केले. अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेल्या पतीने स्वतःची सुटका करून घेत थेट वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले.
पोलिसांनी जखमी पतीला वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी पाठविले. उपचारानंतर पतीने पत्नीविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.
विशेष म्हणजे, कौटुंबिक वादांमध्ये अनेकदा पुरुषांकडून महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर येतात. मात्र या प्रकरणात पत्नीवरच गंभीर आरोप झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. आता या प्रकरणात पोलिसांचा पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई काय होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
॰॰॰॰॰
- ऑर्किड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे MHT-CET परीक्षेत घवघवीत यश


वाळूज महानगर | न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )
बजाजनगर, वाळूज एमआयडीसी येथील सिडको महानगर-१ मधील नामांकित ऑर्किड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या एमएचटी-सीईटी (MHT-CET) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत कॉलेजचा गौरव वाढवला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही गटांतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
पीसीएम गटातून आदिक पूर्वल याने ९९.४२ पर्सेंटाइल मिळवत कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तसेच सिंग प्रियांशू (९८.१३), नेरकर प्रांजल (९७.८१), बोळके यश (९७.२१), सिंग हरिओम (९६.३१), सराफ नरेंद्र (९५.७६), कुलकर्णी निखिल (९३.६७), प्रदुम्न तायडे (९३.०७), चौधरी पुरब (९२.९४), गायकवाड ओम (८९.९०), डिंगरे पृथ्वीराज (८७.२६), काळे नेत्रा (८७.१७) आणि कुंभार सोहम (८२.७७) यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली.
पीसीबी गटातून गुप्ता त्रिलोकचंद याने ९४.५४ पर्सेंटाइल मिळवत प्रथम क्रमांक मिळवला, तर शिंगाडे अनुज याने ९१.०६ पर्सेंटाइल मिळवून यश संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कॉलेजचे प्राचार्य, शिक्षकवृंद आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे हे यश असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
॰॰॰॰
- ESIC रुग्णाकडून अवैध पैसे उकळल्याचा आरोप; हॉस्पिटलने आरोप फेटाळले…


छत्रपती संभाजीनगर | न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )
वाळूज महानगर : ESICधारक कामगार उमेश शेषराव दुधाट यांनी वाळूज महानगरातील वाळूज हॉस्पिटलवर गंभीर आरोप करत कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. उपचारासाठी दाखल झाल्यानंतर अवैधरित्या पैसे उकळणे, उपचारात निष्काळजीपणा, डॉक्टर उपलब्ध नसणे तसेच रुग्णाची अवहेलना करण्यात आल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.
तक्रारीनुसार, उमेश दुधाट यांना ११ जून २०२६ रोजी मूळव्याधीचा तीव्र त्रास सुरू झाल्याने त्यांनी ESIC टाय-अप असलेल्या वाळूज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी धाव घेतली. मात्र सुरुवातीला हॉस्पिटल प्रशासनाने भरती करण्यास नकार दिला. मोबाईलमध्ये उपलब्ध असलेले ESIC कार्ड दाखवूनही त्यांच्याकडून १०० रुपये रोख घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सुरुवातीला त्या रकमेची पावती देण्यास नकार देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
भरती केल्यानंतरही डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगून दोन दिवस प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर गंभीर अवस्थेत असताना औषधे आणण्यासाठी स्वतः खाली जाण्यास भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच हॉस्पिटलमधील स्वच्छतेचा अभाव, दुर्गंधीयुक्त शौचालये आणि सलाईन चुकीच्या पद्धतीने लावल्यामुळे हात सुजणे व रक्तस्त्राव झाल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणि योग्य उपचार न मिळाल्याने अखेरीस त्यांनी बजाजनगर येथे उपचार घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, नंतर पुन्हा हॉस्पिटलमध्ये जाऊन मागणी केल्यानंतर १०० रुपयांची पावती देण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.
या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून संबंधित हॉस्पिटल व जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, ESIC टाय-अप रद्द करावे तसेच झालेल्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासाबद्दल नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी उमेश दुधाट यांनी ESIC प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत वाळूज हॉस्पिटलचे डॉ. अमोल करडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रुग्णाचे आरोप फेटाळून लावले. “ESIC चे अप्रूव्हल येईपर्यंत आम्ही रुग्णांवर उपचार सुरू ठेवतो. अनेकदा रुग्णांकडे ESIC कार्ड किंवा आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसतात. अशा परिस्थितीत हॉस्पिटलचा खर्च होतो. काही रुग्ण उपचार घेऊन वाद घालून निघून जातात. त्यामुळे १०० रुपयांची फी घेऊन उपचार सुरू केले जातात. संबंधित प्रकरणात ESIC चे अप्रूव्हल आले नव्हते. उपचार सुरू असतानाच रुग्ण कोणतीही माहिती न देता हॉस्पिटलमधून निघून गेला आणि नंतर तक्रार दाखल केली,” असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना डॉ. करडे म्हणाले, “ही बाब व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिली असती तर आम्ही रुग्णाचे समाधान करून उपचार पूर्ण केले असते. हा प्रकार काही गैरसमजातून घडला असावा. रुग्णांची सेवा करणे हे आमचे कर्तव्य असून आम्ही नेहमीच रुग्णांना सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करतो.”
दरम्यान, या प्रकरणातील आरोप व प्रत्यारोपांमुळे ESIC संलग्न रुग्णालयांमधील सेवा आणि रुग्णांच्या सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
॰॰॰॰
- रूम भाड्याच्या वादातून तरुणाची आत्महत्या; रूम मालकासह तिघांविरोधात गुन्हा


वाळूज महानगर | न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )
वाळूज महानगर : गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शे.पु. येथील पवननगर परिसरात भाड्याच्या घराच्या वादातून २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून घरमालकासह तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महारुद्र बळीराम राऊत (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचा भाऊ वीरभद्र बळीराम राऊत याने दिलेल्या फिर्यादीनुसार, मे २०२६ मध्ये महारुद्र याने त्याचा मित्र प्रदीप मापारी व त्याची पत्नी पल्लवी मापारी यांना पवननगर येथील बाबासाहेब बटुळे यांची खोली भाड्याने मिळवून दिली होती. मात्र, प्रदीप व पल्लवी यांनी घरमालकाला कोणतीही माहिती न देता तसेच थकीत भाडे न भरता खोली रिकामी करून निघून गेल्याचा आरोप आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, १२ जून रोजी दुपारी बाबासाहेब बटुळे यांनी सलून दुकानात जाऊन महारुद्र राऊत व त्याच्या कुटुंबीयांसमोर थकीत भाड्याची मागणी केली. यावेळी महारुद्रने संबंधितांना फोन करून पैसे मागवून देण्याचे सांगितले असता, बटुळे यांनी त्याचा मोबाईल हिसकावून घेत शिवीगाळ केली तसेच हातपाय तोडण्याची व मारहाण करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेनंतर महारुद्र राऊत घरी गेला. दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास त्याचा भाऊ प्रभात राऊत जेवणासाठी घरी गेला असता घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले. खिडकीतून पाहणी केली असता महारुद्र याने घरातील सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. कुटुंबीयांनी त्याला तत्काळ उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
दरम्यान, मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून बाबासाहेब बटुळे, प्रदीप मापारी व पल्लवी मापारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास वाळूज एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
॰॰॰॰
- पोलिसांची भीती दाखवून सामान्य नागरिकांकडून पैशांची उकळपट्टी? वाळूज एमआयडीसीतील ‘झिरो पोलिस’ पुन्हा सक्रिय असल्याची चर्चा


वाळूज महानगर | प्रतिनिधी
वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या परिसरात स्वतःला पोलिसांशी जवळीक असल्याचे सांगत सामान्य नागरिकांना धमकावून पैसे उकळणाऱ्या कथित ‘झिरो पोलिसां’चा प्रकार पुन्हा चर्चेत आला आहे. तक्रारदारांना पोलिसांची व कायद्याची भीती दाखवून आर्थिक फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बजाजनगर परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका किरकोळ अपघातानंतर हा प्रकार उघडकीस आला. अपघातात एका दुचाकीस्वाराकडून चारचाकी वाहनाला धक्का लागला होता. चारचाकी वाहन धारक पोलिसांची भीती दाखवण्यासाठी मित्र ‘झिरो पोलीस’ ला सांगितले झिरो पोलिसाने संबंधित दुचाकीस्वाराकडे तब्बल एक लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संबंधित दुचाकीस्वार हा सामान्य कामगार असल्याने एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर अटक करू, पोलीस पाठवू, जामीन मिळू देणार नाही अशा धमक्या देत जवळपास आठ दिवस त्याला मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे.
दरम्यान, ९ जून रोजी एका महिलेसह चारचाकी वाहनधारकाने दुचाकीस्वाराच्या रांजनगाव शेणपुणजी येथे घरी जाऊन गोंधळ घातल्याचेही समोर आले आहे. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या काही तरुणांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून, यातील एक तरुण तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला असता त्याच्या नातेवाईकांना फोन करून अटक केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर प्रकरण मिटविण्याच्या नावाखाली संबंधितांकडून तब्बल ३८ हजार रुपये उकळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाची माहिती वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश्वर गाडे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर संबंधित व्यक्तींना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. मात्र, बाहेरगावी असल्याचे कारण देत त्यांनी पोलीस ठाण्यात हजर राहणे टाळल्याचे सांगितले जाते.
सामान्य नागरिक, कामगार आणि तक्रारदारांना कायद्याची पुरेशी माहिती नसल्याचा गैरफायदा घेत काही व्यक्ती पोलिसांशी संबंध असल्याचे भासवून दबाव टाकत असल्याची चर्चा परिसरात आहे. कोणत्याही प्रकरणाशी थेट संबंध नसताना हस्तक्षेप करून आर्थिक व्यवहार करण्याचा प्रकार गंभीर असल्याचे नागरिकांचे मत आहे.
विशेष म्हणजे, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिवसभर वावरणाऱ्या आणि स्वतःला पोलिसांचे निकटवर्तीय म्हणून सादर करणाऱ्या काही कथित ‘झिरो पोलिसां’कडून अशा प्रकारच्या घटनांमध्ये वारंवार हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक रमेश्वर गाडे यांनी स्पष्ट भूमिका मांडत, “आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे झिरो पोलीस नाहीत. पोलिसांच्या नावाचा वापर करून कोणी नागरिकांची फसवणूक करत असेल किंवा पैसे उकळत असेल तर संबंधितांनी तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा,” असे आवाहन केले आहे.
तसेच नागरिकांनी अशा व्यक्तींच्या दबावाला बळी न पडता थेट पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले. आता गोरगरीब कामगार व सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या या कथित झिरो पोलिस टोळीविरोधात पोलीस प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
॰॰॰॰॰
