February 5, 2026
img_0352-1.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) –

वाळूज : लिंबे जळगाव येथे बुधवारी (२ जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. काठ्या, चाकू आणि लोखंडी गजाच्या सहाय्याने दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला चढवला. यामध्ये दोन जण जखमी झाले असून, एक चारचाकी व एक दुचाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी दोन्ही गटांतील सहा जणांना अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष दिगंबर गवळी (वय ४८, रा. लिंबे जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत श्रीकांत पडघन, अंजली नाटकर, करण नाटकर, अर्चना मनाळ व किरण जाधव यांनी गैर कायदेशीर जमाव करून लाकडी दांडे व लोखंडी गजाच्या सहाय्याने त्यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांच्या चारचाकी वाहनाची (एमएच २० एफयू ०१३१) काच फोडून नुकसान केल्याचे नमूद आहे.

दुसरीकडे, श्रीकांत संजय पडघन (वय २१, रा. लिंबे जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीत संतोष गवळी, दिनेश करडे, ज्ञानेश्वर गवळी, गणेश मोटे आणि एक अनोळखी व्यक्ती यांनी संगणमत करून मारहाण केली. यावेळी चाकूचा वापर करून त्याला जखमी केल्याचे सांगितले आहे. तसेच विनयभंगाचा आणि दुचाकीची तोडफोड केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वाळूज पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात संतोष गवळी, दिनेश करडे, गणेश मोटे तसेच श्रीकांत पडघन, करण नाटकर आणि किरण जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. रमेश राठोड करत आहेत.

  • मध्यरात्री रिक्षाला भीषण अपघात; रिक्षाचालकासह महिला प्रवाशाचा मृत्यू, दोन महिला गंभीर

    न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)

    वाळूज महानगर : रेल्वे स्टेशन परिसरातून रांजणगाव शेपू येथे येत असलेल्या एका रिक्षाला गोलवाडी फाटा येथे मध्यरात्री भीषण अपघात झाला. रस्त्यालगत उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला रिक्षा जोरात धडकल्याने या अपघातात रिक्षाचालकासह एका महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना दि. ३ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

    या अपघातात रिक्षाचालक रईस हाशिम शेख (वय ३५, रा. रांजणगाव शेपू) व प्रवासी महिला रुखमिनी येणगे (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर शीतल मोरे (वय २४) व पायल वरदे (वय १९), दोघीही शिवनेरी कॉलोनी, रांजणगाव शेपू, ता. छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

    अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला. रिक्षामध्ये अडकलेल्या जखमी महिलांना बाहेर काढण्यासाठी कटरच्या सहाय्याने रिक्षा कापावी लागली. घटनेची माहिती मिळताच पदमपुरा येथील अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमींना बाहेर काढून तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

    दरम्यान, या अपघातामुळे परिसरात काही काळ हळहळ व्यक्त करण्यात येत होती. घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

    ॰॰॰॰

  • बजाजनगरात आज पंकजाताई मुंडे यांची भव्य सभा; राजकीय वातावरण तापणार

    न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)

    वाळूज महानगर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराने परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून रोज सभा, बैठकांचा धडाका सुरू आहे. काल जय भवानी चौकात मंत्री संजय सिरसाठ यांनी शिवसेनेकडून लढणाऱ्या उमेदवारांच्या समर्थनार्थ जाहीर सभा घेतली होती.

    त्या पार्श्वभूमीवर आज, दि. २ फेब्रुवारी रोजी, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांची मोहटादेवी परिसरातील शिवस्मारक येथे सायंकाळी ठीक ६ वाजता भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमुळे बजाजनगर परिसरातील राजकीय हालचालींना अधिक वेग आला असून पंकजाताई मुंडे या सभेत काय भूमिका मांडणार, कोणते मुद्दे उपस्थित करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप पुरस्कृत उमेदवार सचिन गरड यांच्यासह लक्ष्मण लांढे व अश्विनी गवळी यांनी केले आहे. भाजपकडून या सभेला मोठे महत्त्व दिले जात असून सभेच्या यशस्वीतेसाठी कार्यकर्ते तयारीत गुंतले आहेत.

    दरम्यान, या सभेमुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराला नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    ….

  • आज बजाजनगरमध्ये मंत्री शिरसाठ यांची जाहीर सभा; सावे यांच्या दगाबाजीच्या आरोपांवर काय उत्तर देणार, याकडे नागरिकांचे लक्ष…

    न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)

    वाळूज महानगर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून वाळूज महानगर परिसरात वातावरण चांगलेच तापले आहे. सुरुवातीला शिवसेना–भाजप युती जाहीर करण्यात आली होती; मात्र काही तासांतच ही युती तुटल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू करण्यात आला आहे.

    दरम्यान, बजाजनगरमध्ये मंत्री अतुल सावे यांनी कार्यालयाचे उद्घाटन करताना पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आमची दिशाभूल करून आमच्यासोबत दगाबाजी करण्यात आली, असा आरोप मंत्री सावे यांनी केला होता. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून यावर पालकमंत्री संजय शिरसाठ आज काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    या पार्श्वभूमीवर आज दि. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता बजाजनगर येथील जयभवानी चौकात भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत पालकमंत्री संजय शिरसाठ सावे यांच्या आरोपांवर खुलासा करणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

    दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाळूज महानगरात भाजप, शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळत असून प्रचार अधिक तीव्र होत चालला आहे. आजची सभा राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    ॰॰॰

  • विकासाची गती कायम ठेवण्यासाठी हनुमान भोंडवे यांना विजयी करा – पालकमंत्री संजय शिरसाठ

    न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

    वाळूज महानगर : मी आमदार झाल्यापासून बजाज नगर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. येत्या काळात बजाज नगरला हायटेक करण्याचा संकल्प आहे. त्यासाठी जिल्हा परिषद गट क्रमांक ५१ मधील उमेदवार हनुमान भोंडवे तसेच पंचायत समितीचे उमेदवार मोहिनी ढमढेरे आणि बाळासाहेब गाडे यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन राज्याचे न्याय व सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी केले.

    बजाज नगर येथे शिवसेनेच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिरसाठ म्हणाले की, गेल्या पंधरा वर्षांपासून बजाज नगर परिसरात रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सोसायट्यांमधील अंतर्गत रस्ते, पेव्हर ब्लॉक बसवणे अशी अनेक विकासकामे मार्गी लावण्यात आली आहेत. शिवस्मारकाचे काम पूर्ण करण्यात आले असून मोहटा देवी मंदिराजवळ सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. वडगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाही उभारण्यात आला आहे.

    Screenshot

    पुढील टप्प्यात बजाज नगरला हायटेक करण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते, दोन्ही बाजूंनी पथदिवे, तसेच कामगार बांधवांसाठी मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या विकासासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत मजबूत नेतृत्व आवश्यक असून त्यासाठी हनुमान भोंडवे, मोहिनी ढमढेरे आणि बाळासाहेब गाडे यांना मतदारांनी विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

    या कार्यक्रमाला माजी महापौर त्रिंबक तुपे, नगरसेवक गिरजाराम हळनोर, जिल्हा परिषद उमेदवार हनुमान जगन्नाथ भोंडवे, पंचायत समिती उमेदवार बाळासाहेब वाल्मीक गाडे व रत्नमाला शशिकांत ढमढेरे यांच्यासह अनेक ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि शेकडो महिला व पुरुष मतदार उपस्थित होते.

    ॰॰॰

  • संघर्षातून घडलेला नेता म्हणून दत्तात्रय वर्पे यांची ओळख
    Screenshot

    वाळूज (प्रतिनिधी):
    बजाज नगर व सिडको परिसरातील नागरिकांच्या मूलभूत नागरी सुविधा, आरोग्य आणि स्वच्छतेसाठी सातत्याने संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय भास्करराव वर्पे हे जनतेच्या प्रश्नांचा खरा आवाज म्हणून ओळखले जात आहेत. सामान्य कार्यकर्ता असूनही त्यांनी सिडको प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत अनेक नागरिकांच्या समस्या मार्गी लावल्या आहेत.

    ऐन कोविड काळात सिडकोचे आरोग्य केंद्र बंद करण्यात आल्याने हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. या गंभीर बाबीच्या विरोधात सिडको व एमजीएम प्रशासनाविरोधात दत्तात्रय वर्पे यांनी थेट दशक्रिया विधी आंदोलन करत तीव्र निषेध नोंदवला होता. या आंदोलनाची मोठी दखल घेत प्रशासनाला दुसऱ्याच दिवशी सिडको आरोग्य केंद्र सुरू करावे लागले होते. हे आंदोलन परिसरात विशेष लक्षवेधी ठरले होते. आजही सिडको व गट नंबर परिसरातील हजारो नागरिक या आरोग्य केंद्राचा लाभ घेत आहेत.

    आरोग्य सेवा ही नागरिकांची मूलभूत गरज मानून दत्तात्रय वर्पे हे परिसरात सर्वाधिक मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करत असतात. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे वारंवार आरोग्य शिबिरे होत असून आजपर्यंत हजारो नागरिकांनी या सेवेचा मोफत लाभ घेतला आहे. अनेक नागरिक त्यांना या कार्यासाठी धन्यवाद देत आहेत.

    बजाज नगर परिसरातील डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नावर दत्तात्रय वर्पे यांनी मोठे आंदोलन छेडले होते. या आंदोलनामुळे सिडको प्रशासन अडचणीत आले होते. प्रशासनाने दिलेली आश्वासने पाळली जात नसल्याने त्यांनी सिडको कार्यालयासमोर प्रतिकारक आंदोलन केले. त्यानंतरही प्रश्न कायम राहिल्याने त्यांनी सिडको कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल थेट मंत्रालय स्तरावर घेण्यात आली होती.

    परिसरात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या प्रश्नासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून संबंधित विभागाकडून उपाययोजना करून घेत समस्या मार्गी लावली. तसेच सिडको प्रशासनाकडून रस्त्यावरील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने दत्तात्रय वर्पे यांनी थेट कचरा सिडको कार्यालयासमोर नेऊन ठेवत आंदोलन केले होते. यानंतर सिडको प्रशासनाने तातडीने दखल घेत परिसरातील साफसफाई केली.

    दरम्यान, आगामी पंचायत समिती गण क्रमांक १०० च्या निवडणुकीत दत्तात्रय वर्पे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ही निवडणूक ७ फेब्रुवारी रोजी होणार असून ९ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.

    नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा नेता म्हणून दत्तात्रय वर्पे यांची ओळख असून त्यांच्या कार्यामुळे परिसरात त्यांच्या उमेदवारीकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.

    ….॰॰॰॰


error: Content is protected !!