August 4, 2026
img_0352-1.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) –

वाळूज : लिंबे जळगाव येथे बुधवारी (२ जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. काठ्या, चाकू आणि लोखंडी गजाच्या सहाय्याने दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला चढवला. यामध्ये दोन जण जखमी झाले असून, एक चारचाकी व एक दुचाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी दोन्ही गटांतील सहा जणांना अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष दिगंबर गवळी (वय ४८, रा. लिंबे जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत श्रीकांत पडघन, अंजली नाटकर, करण नाटकर, अर्चना मनाळ व किरण जाधव यांनी गैर कायदेशीर जमाव करून लाकडी दांडे व लोखंडी गजाच्या सहाय्याने त्यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांच्या चारचाकी वाहनाची (एमएच २० एफयू ०१३१) काच फोडून नुकसान केल्याचे नमूद आहे.

दुसरीकडे, श्रीकांत संजय पडघन (वय २१, रा. लिंबे जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीत संतोष गवळी, दिनेश करडे, ज्ञानेश्वर गवळी, गणेश मोटे आणि एक अनोळखी व्यक्ती यांनी संगणमत करून मारहाण केली. यावेळी चाकूचा वापर करून त्याला जखमी केल्याचे सांगितले आहे. तसेच विनयभंगाचा आणि दुचाकीची तोडफोड केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वाळूज पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात संतोष गवळी, दिनेश करडे, गणेश मोटे तसेच श्रीकांत पडघन, करण नाटकर आणि किरण जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. रमेश राठोड करत आहेत.

  • पानटपरीचे कुलूप तोडून सिगारेटचा मोठा साठा चोरीला

    न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर

    बजाजनगर येथील लोकमान्य चौक मोहटादेवी रोड परिसरातील एका पानटपरीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सिगारेटचा मोठा साठा व रोख रक्कम असा ₹२ लाख ३३ हजार ७०० किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल बिबिषण काळे (वय ३६, रा. सिडको महानगर-१, तिसगाव) यांचे लोकमान्य चौक येथे गणेश पान शॉप आहे. २५ जुलै रोजी रात्री दुकान बंद करून ते घरी गेले होते. २६ जुलै रोजी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचे कुलूप व कडी-कोंडा तुटलेला दिसून आला. अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून फोर स्क्वेअर, एम अॅडव्हान्स, फ्युज बँड, शिप्ट बटन व क्लो मिक्स कंपनीच्या सिगारेटची एकूण १,१०० पाकिटे तसेच ₹३५ हजारांची रोख रक्कम असा एकूण ₹२,३३,७०० किमतीचा मुद्देमाल लंपास केला.
    या प्रकरणी  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार उगले करीत आहेत.


    ✴︎

  • आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रती पंढरपूर येथे विठुरायाची महापूजा संपन्न

    न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :(अनिकेत घोडके)

    छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त छत्रपती संभाजीनगरातील प्रती पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थानात अत्यंत भक्तिमय वातावरणात महाभिषेक, महापूजा आणि विशेष पूजेचा सोहळा उत्साहात पार पडला. या वर्षीच्या महापूजेचा मान महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना लाभला.

    मध्यरात्री बारा वाजता विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीवर वैदिक मंत्रोच्चारात महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विठूमाऊलीची विधिवत पूजा करून राज्यातील सर्व नागरिकांना सुख, समृद्धी आणि शांतता लाभावी, शेतकरी समृद्ध राहावेत तसेच कष्टकऱ्यांच्या हाताला कायमस्वरूपी काम मिळावे, अशी प्रार्थना विठुरायाच्या चरणी अर्पण केली.

    यावेळी खासदार संदीपान भुमरे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनीही महापूजा व महाआरतीत सहभाग घेतला. तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र पवार, मंदिराचे पदाधिकारी, मान्यवर, वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    महापूजा आणि आरतीनंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहाटेपासूनच विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण परिसर “ज्ञानोबा-तुकाराम”, “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” अशा नामघोषांनी दुमदुमून गेला होता.

    आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक सोहळ्यामुळे प्रती पंढरपूर परिसराला भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचे अनोखे स्वरूप लाभले. हजारो भाविकांनी विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढी एकादशीचा उत्सव भक्तिभावाने साजरा केला.



  • NEET पेपरफुटी प्रकरणांवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

    फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याची पंतप्रधान मोदींची घोषणा

    न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :

    नवी दिल्ली : देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NEET पेपरफुटीशी संबंधित प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे ही माहिती देत, परीक्षांमधील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचा विश्वास अबाधित राखणे ही केंद्र सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले. पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, तसेच दोषींना लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी विशेष न्यायालयांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

    NEET पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात विद्यार्थी आणि पालकांमध्ये निर्माण झालेली चिंता लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे मानले जात आहे. या निर्णयामुळे प्रकरणांचा जलद निपटारा होऊन परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



  • आषाढी एकादशीनिमित्त वाळूज-पंढरपूर परिसरात वाहतुकीचे विशेष नियोजन

    २५ जुलैपर्यंत अनेक मार्गांवर निर्बंध; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन

    न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर

    आषाढी एकादशीच्या निमित्ताने वाळूज परिसरातील पंढरपूर येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविकांसह सुमारे १५० ते २०० दिंड्या दाखल होणार असल्याने छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी विशेष वाहतूक नियोजन लागू केले आहे. २४ जुलै रोजी रात्री ८ वाजल्यापासून २५ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हे नियोजन लागू राहणार असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    यात्रेनिमित्त राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजूंना तात्पुरती दुकाने उभारली जातात. तसेच भाविक, पायी दिंड्या आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होत असल्याने अपघात टाळणे, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ए.एस. क्लब चौक ते कामगार चौक तसेच ओअॅसिस चौक ते एफडीसी (आंबेडकर) कॉर्नर हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. इसारवाडी फाटा ते कामगार चौक तसेच नगरनाका ते ए.एस. क्लब चौक या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

    जालना, बीड, धुळे, नाशिक, जळगाव, पुणे, अहिल्यानगर तसेच एमआयडीसी वाळूज परिसरातून येणाऱ्या हलक्या व जड वाहनांसाठी महानुभव आश्रम चौक, कांचनवाडी, चित्तेगाव, बिडकीन, इसारवाडी फाटा, साजापूर फाटा, एनआरबी चौक, एफडीसी कॉर्नर, वाल्मी नाका आणि राष्ट्रीय महामार्ग NH-752A या मार्गांवरून पर्यायी वाहतूक वळविण्यात आली आहे.

    एसटी महामंडळाच्या सर्व बसेस आणि खासगी ट्रॅव्हल्सनाही पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिस्थितीनुसार वाहतुकीत आवश्यक ते बदल करण्याचे अधिकार बंदोबस्त प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

    नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे तसेच प्रवासापूर्वी पर्यायी मार्गांची माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी केले आहे.



  • भरधाव कारची उभी कंटेनरला धडक; २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

    न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर

    छत्रपती संभाजीनगरातील वाळूज महानगर परिसरातील साजापूर येथील शांताई पेट्रोल पंपासमोर मंगळवारी (रात्री) सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणारी कार महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून धडकली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग कंटेनरमध्ये घुसून पूर्णपणे चुराडा झाला. या अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा गणेश दहीवाल (वय २०, रा. बजाजनगर, मूळ गाव- गुरु पिंपरी, ता. घनसावंगी, जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे.

    कृष्णा हा एमएच-०२-एक्यू-१३०७ क्रमांकाच्या कारमधून करोडी टोलनाक्याच्या दिशेने एकटाच जात होता. शांताई पेट्रोल पंपासमोर महामार्गाच्या कडेला अधिकृत पार्किंग नसताना उभ्या असलेल्या एनएल-०१-क्यू-८४३७ क्रमांकाच्या कंटेनरला त्याच्या कारची मागून जोरदार धडक बसली. धडकेनंतर कारचा पुढील भाग कंटेनरमध्ये घुसल्याने कृष्णा कारमध्ये अडकून गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

    अपघाताची माहिती मिळताच मृताच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे पीएसआय विनोद आबुज व सहकारी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने कृष्णाला कारमधून बाहेर काढून घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून रात्री सुमारे २.३० वाजता त्याला मृत घोषित केले.

    या प्रकरणी मृताच्या काका कालिदास ज्ञानेश्वर दहीवाल यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अधिकृत पार्किंग नसताना तसेच आवश्यक इशारा (इंडिकेटर) न देता कंटेनर उभा केल्याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय संदीप घुसिंगे करीत आहेत.





error: Content is protected !!