March 29, 2026
IMG-20260329-WA0008

न्युज मराठवाडा वृत्तसेवा :

वाळूज महानगर : बजाजनगर-वडगाव (को.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रलंबित प्रश्न आता गंभीर वळणावर पोहोचले असून, याबाबत पंचायत समिती सदस्य तथा शिवसेना (उबाठा) गटनेते दत्तात्रय वर्पे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
शाळेतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर होत आहे. पावसाळ्यात वर्गखोल्यांचे छत गळत असल्याने विद्यार्थ्यांना शिकवणीदरम्यान मोठा त्रास सहन करावा लागतो. याशिवाय, शाळेत पिण्याच्या स्वच्छ पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
शाळेच्या परिसरात स्वच्छतेचाही मोठा अभाव दिसून येतो. संरक्षक भिंतीलगत कचऱ्याचे ढिग साचत असून, त्याची नियमित विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे अस्वच्छतेमुळे विविध आजारांचा धोका वाढत आहे. तसेच परिसरात वृक्षारोपण आणि ट्री-गार्डची आवश्यकता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
क्रीडांगणाची स्थितीही अत्यंत दयनीय आहे. पावसाळ्यात सांडपाणी साचून मोठ्या प्रमाणात डबकी तयार होतात. मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्ता उंच असल्याने पाणी थेट शाळेच्या आवारात शिरते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हालचालीत अडथळे निर्माण होतात.
याशिवाय, रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत काही मद्यपी शाळेच्या क्रीडांगणावर येऊन मद्यप्राशन करत असल्याचे प्रकार घडत आहेत, ज्यामुळे शाळेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे येथे हायमास्ट दिव्यांची उभारणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी आर.ओ. प्रणाली बसविणे, तसेच अखंडित वीजपुरवठ्यासाठी सोलर सिस्टीम उभारण्याची मागणीही पुढे करण्यात आली आहे.
या सर्व समस्या तातडीने सोडवाव्यात, अन्यथा प्रशासनाविरोधात लोकशाही मार्गाने जनआंदोलन छेडण्याचा इशारा दत्तात्रय वर्पे यांनी दिला आहे.
आता प्रशासन या गंभीर प्रश्नांकडे कितपत वेगाने लक्ष देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!