March 20, 2026
IMG-20260320-WA0035

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :

सिल्लोड : सिल्लोड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपिटीमुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
या गंभीर परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष विजय म्हस्के पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. “शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तत्काळ व वस्तुनिष्ठ पंचनामे करून त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी,” अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, आमठाणा (ता. सिल्लोड) परिसरात गुरुवारी (ता.19) सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाची 36 मिलिमीटर इतकी नोंद झाली असून कांदा, सोंगणीला आलेला गहू, मका यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सतत सुरू असलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, हरभरा, मका, मिरची आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.


शेतकऱ्यांची प्रतिक्रिया :
“अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आमच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मका यांसारखी पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अन्यथा शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी बिकट होईल,” अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
याबाबत आमठाणा येथील माजी सरपंच अरुण शांताराम मोरे यांनीही प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!