March 14, 2026
IMG-20260314-WA0007

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : गोकुळ लांडे

गंगापूर : तालुक्यातील जुने जामगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पशुधनावर हल्ले करून मोठे नुकसान करणारा बिबट अद्याप मोकाट फिरत असल्याने शेतकरी दहशतीत आहेत.

दरम्यान, शुक्रवारी (ता.१३) रात्री सुमारे आठ वाजेच्या सुमारास रघुनाथनगर ते कारखाना फाटा मार्गे कायगावकडे प्रवास करत असताना अमळनेर येथील ग्रामपंचायत सदस्य राधेश्याम कोल्हे यांना शेती महामंडळाच्या शेताजवळ रस्त्यालगत गाडीच्या लाईटच्या प्रकाशात मादी बिबट्याची तीन पिल्ले दिसली. अचानक पिल्ले दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

जुने जामगाव, बोरजाई व कायगाव परिसरात बिबट्याने पाळीव पशुधनावर हल्ले केल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून ग्रामस्थांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. गोदावरी नदीकाठचा परिसर तसेच शेती महामंडळाच्या शेतातील काटेरी झुडपे व दाट वनस्पती यामुळे बिबट्याला लपण्यासाठी अनुकूल अधिवास मिळत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अन्न व पाण्याच्या शोधात वन्यप्राणी या भागात येत असल्याने बिबट्याचा वावर वाढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, राधेश्याम कोल्हे यांनी परिसरातील शेतकरी व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वनविभागानेही ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, शेतात काम करताना सावधगिरी बाळगावी तसेच बिबट किंवा त्याची पिल्ले दिसल्यास त्यांना छेडछाड करू नये, असे आवाहन केले आहे.

पिंजरा लावण्याची मागणी
परिसरातील नागरिकांमध्ये वाढलेली भीती लक्षात घेता बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी सरपंच बशीर पटेल यांनी केली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!