February 25, 2026
1002116051

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही जानेवारी ते जून या सहा महिन्यांत तीव्र पाणीटंचाई जाणवत असून नागरिकांना अक्षरशः पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. “कोणी पाणी देता का पाणी?” असा सवाल करत सारा गौरव हाउसिंग सोसायटीतील ७७ कुटुंबांनी सिडको कार्यालयावर धडक देत निवेदन सादर केले.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सिडकोकडे नियमित पाणीबिल व कर भरूनही मुबलक पाणीपुरवठा होत नाही. परिणामी नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. १८०० लिटर टँकरसाठी सुमारे ४०० रुपये तर ५००० लिटर पाण्यासाठी ६०० रुपये मोजावे लागत असल्याने आर्थिक ताण वाढला आहे.

सिडको प्रशासनाचे म्हणणे आहे की, त्यांना एमआयडीसी कडून आवश्यक तेवढा पाणीपुरवठा होत नाही. “एमआयडीसीने जास्त पाणी दिल्यास आम्ही नागरिकांना पुरवठा वाढवू,” असे अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण आहे. दुसरीकडे एमआयडीसी प्रशासनाने “आमच्याकडेच पाणीसाठा अपुरा असून ठरलेल्या प्रमाणातच पाणी देत आहोत,” असे स्पष्ट केले आहे. या परस्परविरोधी भूमिकेमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.

विशेष म्हणजे, जिल्ह्यातील पैठण येथे असलेल्या जायकवाडी धरण या मोठ्या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवरही वाळूज महानगरात पाणीटंचाई कायम असल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. “धरण उषाला आणि कोरड घशाला” अशी परिस्थिती निर्माण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

आज सारा गौरव सोसायटीचे पदाधिकारी व महिला सदस्यांनी सिडको कार्यालयात जाऊन सहाय्यक कार्यकारी अभियंता कपिल राजपूत व पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख मारुती वावरे यांना निवेदन दिले. यावेळी सोसायटीचे चेअरमन प्रवीण निकम, अंकुश काळवणे यांच्यासह अनेक महिला सदस्य उपस्थित होत्या.

सहाय्यक कार्यकारी अभियंता कपिल राजपूत यांनी “एमआयडीसीसोबत चर्चा सुरू असून अंतर्गत पाणीपुरवठा समस्या सोडवण्यासाठी १०० टक्के प्रयत्न करू,” असे आश्वासन दिले.

दरम्यान, नागरिकांनी लवकरात लवकर ठोस उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. पाणीप्रश्नावर सिडको व एमआयडीसी प्रशासनाने टोलवाटोलवी न करता समन्वय साधून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!