April 21, 2026
IMG-20260421-WA0024

न्युज मराठवाडा वृत्तसेवा :


वाळूज महानगर : औद्योगिक व निवासीदृष्ट्या झपाट्याने वाढणाऱ्या वालूज महानगर परिसरात वारंवार होत असलेल्या वीजपुरवठा खंडित प्रकारामुळे नागरिकांचे जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या समस्येमुळे साईनगर, देवगिरीनगर, अयोध्यानगर, छत्रपतीनगर, समर्थनगर, प्रधाननगर, सतीश विहार आणि परिसरातील अनेक भागातील रहिवासी त्रस्त झाले असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या गंभीर समस्येची दखल घेत पंचायत समिती छत्रपती संभाजीनगरचे गटनेता तथा शिवसेना उपशहर प्रमुख वाळूज महानगर दत्तात्रय वर्पे यांनी महावितरण ग्रामीण विभाग क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वाळूज महानगर परिसरात वाढती लोकसंख्या, नव्या घरांची संख्या आणि व्यावसायिक आस्थापनांची वाढ लक्षात घेता विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र उपलब्ध रोहित्रांची क्षमता अपुरी पडत असल्याने वारंवार वीज खंडित होणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणे आणि अनियमित सेवा मिळणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत.
यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा, घरगुती कामे, विद्यार्थ्यांचे शिक्षण, उद्योगधंदे तसेच व्यापारी व्यवहारांमध्ये मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा अचानक वीज गेल्याने घरातील वीज उपकरणे खराब होण्याचाही धोका निर्माण झाला आहे.
मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे :
विद्यमान रोहित्रांची क्षमता तातडीने वाढवावी.
आवश्यकतेनुसार नवीन अतिरिक्त रोहित्र बसवावेत.
वाढत्या लोकसंख्येनुसार भविष्यातील विजेचे नियोजन करावे.
कमी दाबाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा.
वालूज महानगरातील नागरिकांच्या हितासाठी महावितरण प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून परिसराला अखंडित व सुरळीत वीजपुरवठा द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!