July 10, 2026
IMG-20260709-WA0009

न्युज मराठवाडा वृत्तसेवा :

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील हतनूर–रुईखेडा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.

रुईखेडा येथील वयोवृद्ध रुस्तुम दहातोंडे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांचे पुत्र रामू दहातोंडे यांनी हतनूर येथील डॉ. विवेक अकोलकर यांना उपचारासाठी बोलावले. मात्र, मुसळधार पावसामुळे हतनूर–रुईखेडा मार्ग पूर्णपणे चिखलमय झाल्याने डॉक्टरांना दुचाकीने अर्ध्या वाटेपर्यंतच जाता आले.

अखेर रामू दहातोंडे यांनी आजारी वडिलांना बैलगाडीत बसवून सुमारे तीन किलोमीटरचा खडतर प्रवास करत डॉक्टरांपर्यंत पोहोचवले. त्यानंतर डॉ. अकोलकर यांनी रुग्णावर तातडीने उपचार केले.

या घटनेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांच्या अभावामुळे कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते, याचे जिवंत उदाहरण समोर आले आहे. हतनूर–रुईखेडा रस्त्याच्या दुरुस्तीची कामे मंजूर झाल्याची माहिती असतानाही ती अद्याप पूर्ण झालेली नाही. परिणामी, पावसाळ्यात या मार्गावरून वाहतूक करणे अत्यंत धोकादायक बनले असून रुग्णवाहिकाही गावापर्यंत पोहोचू शकत नाही.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने या रस्त्याचे काम पूर्ण करून ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!