September 8, 2026
n20000862561788865165488a5173aeb25c680ae3c88dfa6c780c92db94afa9865ba9b0a80bb6fdfab10c823(1)

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :

छत्रपती संभाजीनगर : तीसगाव शिवारातील खवड्या डोंगरावरून उडी घेण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने हा परिसर आत्महत्यांचा धोकादायक पॉइंट ठरत आहे. अख्ख्या चांडगुडे कुटुंबाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आता प्रशासनाने सुरक्षेच्या उपाययोजनांकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. डोंगराच्या धोकादायक भागात काटेरी कुंपण उभारणे तसेच CCTV कॅमेरे बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

चांडगुडे कुटुंबाच्या मृत्यूने संभाजीनगर हादरले

२१ ऑगस्ट रोजी झाल्टा फाटा येथील चांडगुडे कुटुंबातील कुणाल, त्याचे वडील मुरलीधर आणि आई संगीता यांचा खवड्या डोंगरावर घडलेल्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला होता. कौटुंबिक वादातून कुणाल खवड्या डोंगरावर गेला होता. त्याची समजूत काढण्यासाठी गेलेले वडील मुरलीधर यांच्यासह कुणाल कड्यावरून खाली कोसळले. त्यानंतर पती आणि मुलाचा मृत्यू डोळ्यांसमोर पाहिल्यानंतर संगीता यांनीही कड्यावरून उडी घेतल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

आणखी बळी जाण्यापूर्वी उपाययोजना करा

खवड्या डोंगरावर यापूर्वीही अनेकांनी जीव गमावल्याने सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने होत आहे. पर्यटन विभाग आणि आयएफसी संस्थेने सादर केलेल्या अहवालानुसार डोंगरावर आवश्यक त्या सुरक्षात्मक उपाययोजनांच्या कामाला तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी जि.प. बांधकाम सभापती सचिन गरड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

शुक्रवारी झालेल्या दिशा समितीच्या बैठकीतही गरड यांनी खवड्या डोंगरावरील सुरक्षेचा मुद्दा ठामपणे मांडला. आणखी एखादी दुर्घटना घडून बळी जाण्याची वाट न पाहता प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!